शुक्रवार, दिसंबर 23, 2005

परफेक्ट!!

३१ डिसेंबरची संध्याकाळ, ६-१५ वाजता निघायचं ठरवुन नेहमीच्या सवयी प्रमाणे आम्ही (म्हणजे "espians" -- SP कॉलेज मधल्या मित्रांचा ग्रुप) ७-१५ ला निघालो. नेहमीप्रमाणे सुरवातीचा थोडा वेळ उशीर नक्की कोणामुळे झाला यावर वाद घालण्यात गेला. साधारणतः ८ च्या सुमारास आम्ही पानशेत जवळच्या "शांतिवन" नावाच्या ठिकाणी पोचलो. नावाप्रमाणे इथे सगळं शांतच होतं. नाही म्हणायला त्या कार्यालयात एक माणुस आणि एक वॉचमन भुतासारखे बसले होते. आम्ही आल्यावर तिथल्या माणसाने " काय कटकट आहे" असे भाव आणुन आमचं बुकींग बघुन २ खोल्यांच्या किल्ल्या दिल्या. अंधार असल्यामुळे आजुबाजुचा परिसर कसा आहे याचा काही अंदाज येत नव्हता. आमच्या खोल्या झोपडीवजा आकाराच्या, समोर छोटीशी ओसरी असलेल्या अशा होत्या. सामान आत ठेवुन आम्ही थोडा वेळ हिंडायला गेलो. परत आल्यावर आमच्या खोल्यांच्या मागच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या खाटांवर गप्पा मारत बसलो. खोल्यांच्या मागच्या बाजुलाच शांतिवनचा "विज्ञान कक्ष" देखिल होता. तिथे अनेक "विज्ञानसंबंधित" गोष्टी होत्या. त्यामधे एक सायकलवर बसलेला हाडांचा सापळा होता (माणसाचा). त्या सापळ्याचं प्रयोजन मला शेवटपर्यंत कळलं नाही. काही वर्षांपुर्वी मी बारीक असण्याच्या बाबतीत त्या सापळ्याला competition देऊ शकलो असतो, पण आता ते शक्य नाही.... असा एक विचार माझ्या मनात डोकावुन गेला.
नंतर वर दिसणार्या निरभ्र आकाशाकडे बघुन प्रत्येकाने आपलं "आकाश निरीक्षणाचं" ज्ञान पाजळायला सुरुवात केली. "व्याध कुठला आणि ध्रुव कुठला .... सप्तर्षी कसे ओळखायचे ... मृग नक्षत्र कधी दिसतं" अशा अतिशय मुलभूत प्रश्नांवर वाद चालू होते. मला आकाशात फक्त चंद्र आणि सूर्य एवढ्याच गोष्टी ओळखता येत असल्यामुळे मी त्या वादात फारसा पडलो नाही.
थोड्या वेळाने वादाची तीव्रता कमी झाल्यावर "वा! किती छान शांत वाटतं आहे" असं आम्ही म्हणायला ... आणि थोड्या वेळापूर्वी तिथे आलेल्या एका ग्रुपने त्यांनी आणलेल्या एका महाकाय music system वर कर्णकर्कश्य आवाजात "कसा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गाणं लावायला एकच गाठ पडली. आम्ही एरवी तावातावाने त्यांच्याशी भांडलो असतो पण तिथं जाऊन पाहिलं तर काही आमच्या वयाची आणि काही आमच्यापेक्षा वयाने बरीच मोठी माणसं, लहान मुलांच्या वाढदिवसाला घालतात तशा कोनाच्या आकाराच्या टोप्या डोक्यावर घालुन नाचत होती. आम्ही हताश होउन आपल्या जागेवर परतलो.
भूक वाढायला लागली होती पण तिथली माणसं काही सांगितलेल्या वेळी जेवण द्यायला तयार नव्हती. आमच्या संयमाची पुरेपुर परीक्षा घेउन झाल्यावर त्यांनी आम्हाला जेवण दिलं. तेच जेवण मी आत्ता जेवलो तर मला ते आवडेल का? हे मला सांगता येणार नाही. जेवण आवडायला नुसती अन्नाची चवच नाही तर आजुबाजुची परिस्थिती पण तितकीच आवश्यक असते. न थांबता एका दमात सिंहगड चढुन गेलेल्या माणसाला विचारावं की पिठलं भाकरी कशी लागते .... पण एखाद्या मित्राला engineering च्या परिक्षेच्या आदल्या दिवशी जेवताना "श्रीखंड कसं झालंय?" हा प्रश्न कोणीही विचारु नये.... थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या दिवशी जोरदार भुकेमुळे, छान गार हवेमुळे, (बाजुला चालु असलेल्या "मेरे पिया गये रंगुन" च्या REMIX मुळे) आणि मुख्य म्हणजे जवळच्या मित्रांच्या संगतीमुळे असं काही छान जेवण झालं ... की जवाब नही!!!
पोटभर जेवणानंतर छान filter coffee प्यायलो आणि आम्ही वख्खई खेळायला बसलो. त्या दुसर्या ग्रुपची गाण्याची अभिरुची फारच चमत्कारीक होती. रिमिक्स नंतर "शोला जो भडके" वगैरे जुनी हिंदी गाणी आणि मग मराठी भक्तीसंगीतावर गाडी घसरली होती. त्यामुळे त्याच्या मानसिक आणि बौद्धिक संतुलनाबद्दल आमच्या मनातला संशय अजुनच गाढ झाला हे वेगळं सांगायला नको.
पत्त्यांचा डाव आणि गप्पा छान रंगल्या होत्या. बघता बघता पहाटेचे ४ कधी वाजले आणि गप्पा मारत आम्ही झोपलो कधी ते कळलं पण नाही. सकाळी उठल्यावर कळलं की भोवतालचा परिसर फारच सुंदर होता. मग थोडा वेळ फोटोग्राफीमधे गेला, परत भूक लागली. न्याहारीला झकासपैकी पोहे-कांदाभजी आणि चहा वा!! , गार हवेत या पदार्थांची मजा काय असते हे कोणाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.
भरल्या पोटाने आणि उतु जाणार्या आनंदानं मी तिथुन निघालो. या सगळ्याचं एका शब्दात वर्णन करायला माझं मराठीचं ज्ञान तोकडं पडतं. या नविन वर्षाची सुरवात शांततेतही नव्हती, दंग्यात पण नव्हती, नाट्यमय नव्हती, निरुत्साही पण नव्हती, भव्य-दिव्य नव्हती, यःकश्चितही पण नव्हती , ती होती ...... परफेक्ट!!
Originally posted on 1/19/2005